Maharashtra rain : नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) महाराष्ट्रातून बहुतांश माघार घेतली असली तरी, राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने आज (दि. १५) दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पावसाचा जोर ‘या’ जिल्ह्यांमध्ये अधिक
येत्या २४ तासांत राज्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः खालील जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे:
- दक्षिण महाराष्ट्र व कोकण: सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज
याव्यतिरिक्त, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
- मराठवाडा: अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.
- विदर्भ: यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम.
मुंबई, पुणे, नाशिकमध्ये स्थिती काय?
पुणे, ठाणे, मुंबई, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. तथापि, स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाल्यास हलक्या सरी कोसळू शकतात. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान साधारणपणे कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Maharashtra rain पावसाच्या पुनरागमानाचे कारण
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प महाराष्ट्राकडे येत आहे. यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढली आहे आणि ढगनिर्मितीसाठी योग्य परिस्थिती तयार झाली आहे. याचाच परिणाम म्हणून, राज्यात, विशेषतः दुपारनंतर उष्णता वाढून स्थानिक पातळीवर ढग जमा होत आहेत आणि पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीकामांचे नियोजन करताना हवामानाचा हा अंदाज विचारात घ्यावा, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.