Cyclone Montha : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर दिसू लागला आहे. या वादळामुळे राज्यात पुढील काही दिवस वातावरणामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाडा या भागांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Cyclone Montha चक्रीवादळाची सद्यस्थिती आणि वाटचाल
नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, ते सध्या वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ ताशी १५ किलोमीटर वेगाने पुढे जात असून, येत्या १२ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर अति तीव्र चक्रीवादळात होऊ शकते.
सध्या हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून सुमारे ६५० किलोमीटर आणि ओदिशातील गोपालपूरपासून सुमारे ७९० किलोमीटर अंतरावर आहे. हे वादळ मंगळवारी रात्रीपर्यंत आंध्र प्रदेशातील काकीनाडा, मछलीपट्टणम आणि कलिंगापट्टणम दरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी किनाऱ्यावर ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
‘मोंथा’चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात असले तरी, त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुढील तीन दिवस वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर, पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात हवामान बदलांना गती मिळाली आहे.
१. विदर्भ
विदर्भात या वादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. विशेषतः यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गुरुवारीदेखील विदर्भात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
२. मराठवाडा
चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राच्या दिशेने झुकल्यास मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
३. मध्य महाराष्ट्र आणि कोकण
मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नागरिकांना आवाहन
राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस हवामान बदलाचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. सुरक्षितता बाळगावी आणि अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यांपासून तसेच विजेच्या कडकडाटापासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.